Thursday 27 September 2018

आता आमचं नातं मित्रत्त्वाचं होऊ लागलं आहे

मी प्रथमच वडील होणार होतो. मनात विचार येत होते, माझं बाळ कसं असेल? मुलगा किंवा मुलगी काही असो ते निरोगी असावे असा विचार मनात येत होता, अशाच नाना विचारांच्या तंद्रीत असताना अचानक लहान मूल रडण्याचा आवाज कानी आला. अगदी मनातून वाटले हे आपलंच बाळ आणि ते खरंपण होतं. सिस्टर आल्या त्यांनी सांगितलं, “मुलगा झाला आहे, बाळाची व आईची तब्येत एकदम चांगली आहे.” मला एकदम काय बोलावं काही सुचत नव्हतं. मला खूप खूप आनंद झाला होता. मी एखादा राजा असतो तर गळयातील माळ काढून त्याक्षणी नक्कीच दिली असती. मी विचारलं कधी बघता येईल बाळाला. तिने सांगितलं, अर्धातास लागेल अजून. कधी एकदा बाळाला बघतो, असं मला झालं होतं. तो आनंद काही वेगळाच होता तो शब्दात कधीच वर्णन करून सांगता येणार नाही. शेवटी तो क्षण आला. मी त्याला पाहिलं आणि खळकन् आनंदाश्रू आले, त्याचा गोरापान गुलाबी रंग एखादया गुलाबाच्या कळीसारखा दिसत होता. छोटे छोटे नाजूक हात, पाय, नाजूक ओठ, नाक, कान, मोठं कपाळ त्याच्या सौंदर्यात भर घालत होते. त्याच्या डोक्यावर असलेल्या केसांमुळे तो अधिकच सुंदर दिसत होता. मला तर त्याच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं. त्याने हळूच डोळे उघडून पाहिलं. त्याचं ते पहिलं पाहणं मी अजूनही विसरू शकत नाही. मी देवाचे आभार मानले. घरचे सगळे बाळाला बघायला आले. माझा आईने बाळासाठी ‘विश्‍वम’ हे नाव सुचवलं.
विश्‍वम रडला की त्याला घेणं, त्याला खेळवणं, त्याल हवं नको ते पाहणं हे सगळं मी अगदी आनंदाने केलं. त्याच्या सगळया वेळा ठरलेल्या होत्या. तो दिवसा जास्त झोपायचा आणि रात्री जागायचा. त्यामुळे आम्हीपण रात्री जागत असू. तसं जागं राहण्यात पण एक वेगळाच आनंद होता. कधी तो खूप रडला तर मी अगदी घाबरून जायचो. त्याला कडेवर घेऊन वेगवेगळे आवाज काढून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करायचो. आजपण ती माझी तारांबळ आठवली की मला माझंच हसू येतं. आता त्याला माणसं ओळखू येऊ लागली. त्याला रोज न चुकता फिरायला घेऊन जाणं, वेगवेगळ्या गोष्टी दाखवणं, त्यांची नावं सांगणं हे सर्व काही चालत असे. तासनतास त्याच्याशी बोलण्यात वेळ कसा निघून जायचा तेही कळत नव्हतं. त्याला ट्रिपल पोलीओचं इंजेक्शन दिलं त्यावेळेस त्याचं रडणं बघून मलाही रडू आलं होतं.
हळूहळू विश्‍वम मोठा होत होता. रोज रात्री झोपायच्या आधी अंगावर उडया मारणं, धिंगाणा करणं असे उदयोग चालत. मी जेवत असलो की हापण माझा सोबतच माझा मांडीवर येऊन बसायचा. अगदी हॉटेलमधे गेले तरी मी विश्‍वमला सोबत घेऊनच जेवायचो. त्याला खाऊ घालणं, त्याच्यासोबत खेळणं, त्याला आंघोळ घालणं अशा कितीतरी गोष्टी मी करत होतो. पहाता पहाता दिवस जात होते. आता विश्‍वमला गोष्टी कळू लागल्या म्हणून न चुकता रोज रात्री एक गोष्ट मी त्याला सांगत असे. साधारणपणे तो वर्षभराचा झाला त्यावेळेस पासून मी त्याला गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. आजपर्यंत हा दिनक्रम चालूच आहे. आणि विशेष म्हणजे त्याला रोज वेगळी गोष्ट सांगावी लागते. कोणतीही गोष्ट रिपीट झालेली त्याला चालत नाही. यातून आमच्या दोघांचे संबंध अजून चांगले व घनिष्ठ होत गेले.
आता विश्‍वम तिसरीत आहे. त्याला नदीत डुंबायला, डोंगर चढायला, शेतात जायला अशा अनेक गोष्टीत खूप रस आहे. अ‍ॅक्शन मूव्ही त्याला खूप आवडतात. आता वाचनाचा नाद देखील लागला आहे. एकदा वाचलेले, लिहिलेले त्याच्या सहज लक्षात राहतं. त्याला चित्र काढायला आवडतात. गोष्टी लिहायला तो शिकला आहे. नवनवीन प्रयोग करायला त्याला आवडतात. त्याच्या शाळेतील सगळया गोष्टी तो मला सांगतोच तसंच मित्रासारख्या माझाशी गप्पा मारतो, खेळतो. वडील आणि मुलगा हे नातं आहेच. पण आता आमचं नातं मित्रत्त्वाचं होऊ लागलं आहे. त्याने फक्त मोठं व्हावं, सुखी व्हावे, स्वतःची जबाबदारीची जाणीव त्याला नेहमी असावी, असं वाटतं.
- चैतन्य सुरेश कुलकर्णी, व्यावसायिक.

No comments:

Post a Comment