Tuesday 21 May 2019

एमबीए शिक्षण घेतलं शेतमालविक्रीच्या कामी आलं


दिनेश चव्हाण. शिक्षण बी एस्सी झुओलॉजी आणि एमबीए इन मार्केटिंग. पुण्यात पाच वर्ष फार्मा क्षेत्रात नोकरी. सध्या मुक्काम पोस्ट दापोली. दापोलीच्या भाजी मंडईत भाजी विक्री.

दिनेश यांचं बालपण आजीसोबत दापोलीत गेलं. तेव्हाच शेतीची आवड निर्माण झाली. त्यामुळे शिक्षण पुण्यात झालं तरी नोकरी न करता गावाला जायचं याची खूणगाठ बांधली गेली होती. साधारण चार वर्षांपूर्वी, वर्षभरासाठी अर्थार्जनाची तरतूद त्यांनी केली. नोकरी सोडली आणि दापोलीत आले. भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर कलिंगडाचं पीक घेतलं. खर्च आला ६० हजार रुपये. उत्पन्न मिळालं ५ हजार रुपये. सोबत भाजी विक्री केली. पहिल्या वर्षी १५ हजार रुपये नफा.  पहिलं वर्ष अर्थार्जनाच्या दृष्टीनं फारसं नफ्याचं ठरलं नाही तरी काही गोष्टी लक्षात आल्या. त्यातली एक म्हणजे शेतकरी मेहनतीनं पीक तर घेतो पण योग्य बाजारपेठ मिळवण्यात तो मागे पडतो. दिनेश यांनी याबाबत आपल्या शिक्षणाचा, मार्केटिंगमधल्या अनुभवाचा उपयोग करायचा ठरवलं. विषमुक्त शेतीचं महत्त्व लक्षात घेऊन दापोलीच्या आसपासच्या अशा शेतकऱ्यांना त्यांनी शोधलं. तिसऱ्या वर्षी नफा १ लाख ३० हजार रुपयांवर पोहोचला.
    सध्या पाच शेतकऱ्यांचा शेतमाल ते दापोली बाजारात विकतात. घरपोच सेवाही पुरवतात. शेतमाल विकण्यासोबतच दिनेश शेतजमीन भाडेतत्त्वावर घेऊन कणगरे, कडधान्ये, हळद, आलं, भोपळा अशी विविध पिकं घेतात.  शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना योग्य भाव मिळवून देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. जे करतोय त्यात आनंद असल्याचं ते सांगतात. कोकणातला तरुण पुन्हा शेतीकडे वळत असल्याचं त्यांचं निरीक्षण आहे. ' शेतीशिवाय पर्याय नाही , शेती विकू नका' असा सल्ला ते आपल्या शेतकरी मित्रांना देतात.
दिनेश चव्हाण-७३७८८३६०१५

- संतोष बोबडे, रत्नागिरी

No comments:

Post a Comment