Tuesday 21 May 2019

रोजची नवी गोष्ट हेच उमेदचं वेगळेपण

आज नवी उमेदचा तिसरा वर्धापनदिन. नवी उमेदसोबत काम करायला लागून मला तीन वर्ष झाली हे खरंच वाटत नाहीये, आजही. कारण रोजच्या कामात असणारं नवेपण. रोज ताजी पोस्ट, तीही लोकांच्या जगण्याच्या विषयावरची, वेगळी माहिती, वेगळं गाव आणि वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण माणसं या निमित्ताने स्टोरीतून भेटतात. हेच या कामाचं वेगळेपण.
२५ जिल्ह्यांतल्या, उमेदसाठी लिहिणार्‍या सर्वच प्रतिनिधींशी सतत चर्चा सुरू राहाते. तिथल्या घडामोडी कळत राहतात. आपापल्या जिल्ह्यातलं अमूक सांगायला हवं, हे लोकांना कळायला हवं, ही व्यक्ती वेगळं काम करते आहे, ते पुढं यायला हवं, असं सर्वांनाच वाटत असतं. आणि त्यातूनच नव्यानव्या कहाण्या उमेदवर येत असतात. माझ्या या सहकार्‍यांशी वरचेवर बोलत राहणं, त्यांच्याकडून काही ऐकत राहणं, हे सगळंच नवा उत्साह देणारं असतं. एखाद्या विषयावर सखोल मांडणी करणार्‍या मालिका किंवा सदरं हे नवी उमेदचं वेगळेपण. अशा मालिका सुचवणं, महाराष्ट्रभरचे लेखक मिळवून देणं आणि मिटिंगच्या काळात हिरीरीने नव्या कल्पना मांडणं, हे सगळंच टीमचा उत्साह वाढवत असतं.
खरा आनंद मिळतो तो एखादी पोस्ट जेव्हा हजारो, लाखो लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्सचा टप्पा पार पाडते. अगदी सुरूवातीच्या वर्षातली बार्शी इथल्या सीताफळ बागेची, नंतर बीड इथल्या दत्तप्रसाद भोजनालयाच्या अन्नदानाची, मलकापूरच्या मुलींसाठीच्या बससेवेची, रत्नागिरीच्या डॉ ढाकणे यांच्याविषयीची, बीडच्या सर्पराज्ञी प्राणी अनाथालयाची आणि नुकतीच प्रकाशित झालेली हातखंब्याची आधुनिक सावित्री यासारख्या कथांनी असे उच्चांक गाठले आणि नवी उमेद टीमला आपल्या कामाचं समाधान मिळवून दिलं. रोज ताजी कथा पाठवणारे माझे सहकारी जिल्हा प्रतिनिधी यांचाच नवी उमेदच्या यशात, वाचकप्रियतेत खरा वाटा आहे. त्यासाठी त्या सर्वांचे मनापासून आभार.
वाचकांना असंच सकस, उमेद देणारं द्यायला हवं ही जबाबदारी वाढते आहे. तिसर्‍या वाढदिवसानिमित्त तीन नव्या मालिकांची घोषणा पेजवरून केली आहेच. येत्या वर्षात, काही नव्या मालिका आणि कल्पनांसह भेटतच राहू. दररोज.
- वर्षा जोशी - आठवले, संपादक - समन्वयक, नवी उमेद
 

#नवीउमेदतिसरावर्धापनदिन

No comments:

Post a Comment