Tuesday 21 May 2019

दुष्काळावर मात, सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात उभारली वॉटर बँक... सदा आबाची ऐका वाणी (भाग क्रमांक १३)

दुष्काळ जसां माणसाला पोळवतो, तसा धडाबी देतो. त्यातून माणूस सुधरतो. आता एक चांगली गोष्ट सांगतो. धडगाव (जि.नंदूरबार) हा तालुका अति दुर्गम अन‌् सातपुड्याचा डोंगर दऱ्यातला. इथ अनेक नद्याचां उगम व्हतो. पावसाचं पाणी वाहून जातं. गेल्या पाच वर्षापासून पर्जन्यमान कमी झालं. त्यात जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ.
या भागातील वाहून जाणारे पाणी साचले तर ते उन्हाळ्यात कामास येईल, ही आयड्या वसंत पाडवी या काकरदा इथल्या शेतकऱ्याला सुचली. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या शेताशेजारील आठ ते दहा शेतकऱ्यास्नी एकत्र केलं. त्यांनी शासनाच्या सामूहिक शेत तळे योजनेचा लाभ घेतला. मात्र, या अनुदानात पाहिजे त्या आकाराचे तळे हुत नव्हतं. मंग काय या गड्यांनी पदरचे पैसे टाकले आण‌् ४० गुंठ्यांत शेत तळे बनवले. कृषी अधिकारी आर.एम.पाडवी यांनीबी साथ दिली. त्यात पावसाळ्यात हजारो लिटर पाणी साचले. त्यात मत्स्य व्यवसायबी सुरू केला. यातून खर्च निघून ४० हजार रुपये नफाबी निघला. इशेष म्हंजे हे पाणी वापरण्याची बी आचार संहिता शेतकऱ्यांनी केलीयं.
याला शेतकरी वॉटर बँक म्हणत्यात. काकरदा येथील एका शेतकऱ्याने वाईस पुढाकार घेतला आन दुष्काळावर मात करण शक्य झालं. या भव्य वॉटर बँकेतून अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळत हाये. हे पाणीबी ठिबक, स्प्रिंकलर, ड्रीपने वाचवून दिल जातयं. प्रत्येक शेतकऱ्याला एका दिवसा आड २० मिनिट पाणी मिळतं. या पाण्यातून सीताफळ, आंबा, आवळा, काजू, भाजीपाला ही पिके ते घेतात. पाणीबचतीतून उन्नती साधत शेतकऱ्यांनी ‘जलही जीवन है’ ह्यो संदेश दिलायं.
धडगाव तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील वाॅटर बँक आता सरकारने दुष्काळग्रस्त भागात राबवावी हीच ह्या सदाआबाची इच्छा... 

- रूपेश जाधव, नंदूरबार

No comments:

Post a Comment