Thursday 14 March 2019

और कारवाँ बनता गया...

साल १९९१. केंजळच्या जिल्हा परिषद शाळेत रूजू झालो, सात जणांचा स्टाफ, पहिली ते सातवीपर्यंत वर्ग. आमच्या केंजळ शाळेचा तेव्हाचा परिसर म्हणजे एक बाभळीचे झाड आणि १९५७ साली गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधलेली तीन खोल्यांची दगडी इमारत. अत्यंत ओबडधोबड, खडकाळ परिसर, पण तब्बल २ एकर १ गुंठा जमीन शाळेच्या नावावर होती! या शाळेचा विकास करायचं स्वप्न मात्र मी रूजू झालो तेव्हापासूनच पाहिलं. खरंतर माझं मूळ गाव कोल्हापूरच्या सीमाभागातलं. त्यामुळे माझ्या आणि मुलांच्या भाषेत फरक होता. मात्र भाषेवर विशेष मेहनत घेत, मुलांशी संवाद साधत शालेय परिसरात एक वेगळं आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलो. शाळेत मुलांना मजा वाटेल, त्या बरोबर त्यांचं अध्ययनही घडेल असे अनेक उपक्रम आजतागायत सुरूच आहेत. विविधगुण दर्शन, शाळेचं स्नेहसंमेलन तर १९९२ सालापासून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. प्रौढ साक्षरता वर्गांच्या पाच वर्षांच्या काळात (१९९२ ते १९९६) गावात रात्री ११ वाजेपर्यत आम्ही सगळे शिक्षक हजर असायचो. तसेच गावातील अखंड हरिनाम सप्ताहातील प्रवचनांची धाटणी बदलण्याचा मी प्रयत्न केला. प्रा. शिवाजीराव भोसले, प्रा. यशवंत पाटणे, असे अनेक वक्ते आणून शिक्षण किती महत्वाचं आहे, शिक्षणानेच उज्ज्वल भविष्य घडणार आहे, याबाबत गावात जागृतीचा प्रयत्न केला.

मुलांना प्रात्यक्षिकातून अनुभव मिळावेत, यासाठी मी आग्रही होतो. उदा. खगोलशास्त्रज्ञ डॉ प्रकाश तुपे आणि टीम यांच्या उपस्थितीत एकदा दुर्बिणी शालेय प्रांगणात सेट करून, रात्रभर अवकाश निरिक्षणाचा उपक्रम आम्ही घेतला होता, याला केवळ केंजळच नव्हे तर पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांनी सुद्धा गर्दी केली होती. सुरूवातीला स्नेहसंमेलनासाठी तात्पुरते संगीत मार्गदर्शक आणून काम भागवायचो. पण आज शाळेचा स्वतंत्र गायन-वादन समूह आहे. त्याकरिता २०१० सालापासून शाळेत शास्त्रीय संगीत शिकविण्याकरिता ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून संगीत विशारद असलेल्या सुरेश खोपडे सरांची नेमणूक केली आहे. सांगायला आनंद वाटतो की ३५ विद्यार्थी आज शाळेच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत.
शाळेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केंजळ ही 'अॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग' उपक्रम राबविणारी राज्यातील अग्रगण्य शाळा आहे. घोकंपट्टीपेक्षा कृतीतून शिकण्यासाठी सर्व विषयांचे सुमारे ४५०० ‘अॅक्टिव्हिटी शीटस्’ बनविले आहेत, त्याचा आमच्या प्रत्येक वर्गात प्रत्यक्ष वापर केला जातो. आमच्या शाळेत इयत्ता- तुकड्या नाहीत तर प्रत्येक विषयाच्या प्रयोगशाळा आहेत. उदा. गणित लॅब, इंग्लिश लॅब, मराठी लॅब इ. मुलं ज्या विषयाचा तास असेल त्या लॅबमध्ये येतात आणि प्रत्यक्ष कृतीमधून अध्ययन शिकतात. शिवाय इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेत वर्गशिक्षक ही संकल्पना नाही, तर आमच्याकडे विषयशिक्षक आहेत. तसेच इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेत केवळ ३५ मिनिटांचा घड्याळी तास नसतो, तर एखादी संकल्पना विद्यार्थ्यांना पूर्ण समजून त्यानुसार कृती करता येण्यासाठी कधी- कधी दोन- दोन तासही एखाद्या विषयाला घेण्याचं स्वातंत्र्य आम्हांला आहे.
याशिवाय शाळेत अपारंपरिक उर्जास्रोतांचे महत्त्व शिकविणारे 'विघ्नहर्ता उर्जा पार्क' आहे, शाळेच्या संपूर्ण परिसरात वायफाय असून केंजळ शाळा आज राज्यातील अग्रगण्य शाळा म्हणून ओळखली जाते.
विघ्नहर्ता उर्जा पार्क आणि शाळेच्या अन्य उपक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/2RKPTTE
- जयगोंडा कलगोंडा पाटील, सहायक शिक्षक, जि.प. शाळा केंजळ, ता. भोर, जि.पुणे.

No comments:

Post a Comment