Thursday 14 March 2019

कळवण्यास समाधान वाटत आहे की..

तुळजापूरमधल्या तुळजाभवानी मंदिर परिसासमोरील बालभिक्षेकऱ्यांची समस्या नवी उमेदनं ३१ जानेवारीला ( https://m.facebook.com/story.php?story_fbid=2266443430345477&id=1487663018223526 ) मांडली होती. राष्ट्रीय अपराध जाँच ब्युरो ही स्वयंसेवी संस्था यासाठी प्रयत्न करत होती. वर्षभर न सुटलेल्या समस्येवर पोस्ट प्रकाशित होताच चक्र हलू लागली.
२१ फेब्रुवारीला उस्मानाबाद जिल्हा बालकल्याण समितीनं पोलिसांच्या सहकार्यानं पहिली यशस्वी कारवाई केली. भीक मागणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीला महिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिला उस्मानाबाद बालकल्याण समितीसमोर हजर केलं. तिच्या पालकांना बोलावलं. चौकशी केली. मुलीचे वडील सोबत राहत नाहीत. आईशी चर्चा झाली. तीन मुलींमध्ये १३ वर्षांची मुलगी मोठी. जिल्हा परिषद कन्या प्रशालेत सहावीच्या वर्गात शिकणारी. मुलीची इच्छा खरं तर शिक्षक होण्याची. पण परिस्थितीमुळे भीक मागायला लागत होती.
आता शासकीय यंत्रणा या तिघी बहिणींची राहण्याखाण्याची सोय करणार आहे. नळदुर्ग इथल्या 'आपलं घर ' संस्थेत त्यांना ठेवण्याचं नियोजन आहे. १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत शासनाच्या देखरेखीखाली त्यांचं शिक्षण होणार आहे.
तत्पूर्वी चार दिवस आधी राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी मंदिर प्रशासन कार्यालयात सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेतली. सविस्तर चर्चा झाली. गेलं वर्षभर ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रीय अपराध जाँच ब्युरोचे संजयकुमार बोंदर, तहसीलदार योगिता कोल्हे , महिला बाल कल्याण अधिकारी अशोक सावंत, नगरपालिकेचे प्रतिनिधी एम आय शेख, तुळजापूरचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, तालुका बालकल्याण अधिकारी दिनेश घुगे, जिल्हा परिविक्षा अधिकारी बाळकृष्ण शेळके, जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष आश्रुबा कदम , तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास समितीचे सदस्य नागेश नाईक, राष्ट्रतेज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुलचंद व्यवहारे, नागेश शितोळे, नितीन ईरकल आदी मान्यवरांची बैठकीला उपस्थिती.
कृतीदल स्थापन करा आणि कठोर पण संवेदनशीलपणे बालभिक्षेकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा असे निर्देश घुगे यांनी बैठकीत दिले. प्रत्येक अधिकाऱ्यानं काम करण्याचं, आपल्या अधिकारांचा वापर करण्याचं महत्त्व घुगे यांनी समजावलं. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर पोलीस यंत्रणा, तुळजापूर नगरपरिषद बालकल्याण समिती, महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन यांचं कृती दल स्थापन करावं. प्रशासनाला लागेल ते सहकार्य राज्य बाल हक्क आयोग देईल, अशी ग्वाही घुगे यांनी दिली.
मुंबईमध्ये सर्वधर्मीय 20 धार्मिक स्थळांना समोर ठेवून आयोगानं भिकाऱ्यांच्या व लहान मुलांच्या भीक मागण्याच्या समस्येबाबत सविस्तर अभ्यास करून मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं घुगे यांनी सांगितलं. बिलाल मशीद इथल्या समस्येबाबत मशिदीच्या विश्वस्तांकडून मिळालेल्या प्रतिसादाचं अनुकरण तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनीही करावं असं त्यांनी सुचवलं. भीक मागण्यापासून मोठ्यांना आणि लहानग्यांना परावृत्त करण्यासाठी प्रशासनालाच जबाबदारी उचलावी लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या कारवाईबाबत समाधान व्यक्त होत आहे.
कोणतीही समस्या सोडवण्यात सोशल मीडियाचा हातभार आज गरजेचा आहे. नवी उमेद तेच काम करत आहे, याचं समाधान आहे.
- अनिल आगलावे, उस्मानाबाद

No comments:

Post a Comment