Monday 25 March 2019

कुलूपबंद घर.... (सदा आबाची ऐका वाणी भाग ७)

नमस्कार दोस्तांनू? कस चाललयं? बर हाय नव्ह‌ं? 
हा आता पाण्याचे हाल हैत तुमचं हे माहितै न्हाई का या सदाआबाला. पर सद्या बर हायं, लै गावं सद्या रिकामी हायतं. मजूर तोडीला गेलतं नव्हं का! आता तुम्हास्नी गोष्ट सांगतो ती राणीउंचेगावची (जि.जालना). 
जिथं अनेक घरं कुलूपबंद झालेती. तुम्ही आज गावास भेटलास तर तुम्हास कळनं.
औंदा पीक पाणी नसल्यानं तिथालले बी लोकं मोक्कार झाले. शिवारात काम नसल की हाताची अन् पोटाची गाठ होते का? ह्यो सवाल. यंदा पाऊस ईल ईल म्हणता दगा दिला. मंग काय, राणीउंचेगावातलं शेतमजूर, कामगार, निघालं उसतोडीला.
इशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यास्नी धा-ईस एकर जमीन हाय, त्यास्नी बी काय कराव कळना गेलयं. पाणी नाही मंग बैल, बारदाणा कसा सांभाळायचा. पावसाच्या भरोशावर तूर लावली. पर त्याला शेंगा सुदीक न्हाईत. मग पळहाट्या तोडून आता ते पेंढ करून गुरास्नी टाकीत हायेत.
मह्यासारखे भूमीहीन लोकं काय करतेल. गावात काम न्हाईत. निघाले शहराकडे. बंजारा, भिल्ल वस्ती रिकामी झाली. काही बिऱ्हाडं उसतोडीसाठी गेली तर काही शहराकडे कामधंद्यासाठी. या बिऱ्हाडातील पोर बाळं जी गावातील आश्रमशाळा, झेडपीच्या शाळेत व्हती, ती शाळा सोडून मायबापासंग गेली. काय करत्यात ते आधी पोटाेबा येतो नव्हं का?
ऑक्टोबरपासून गाव मोकळं होत गेलं. वस्त्या ओस पडू लागल्या. आता गाव, शिवारात फिराल तर अनेक घरांना टाळ लागलेलं दिसलं. हे चित्तरचं तुम्हास्नी दुष्काळ असा माणसाला पळवीतो हे सांगन. अजूक ५ महिनं जायचेत. ज्यांच्या हातास्नी काम नव्हत ती गाव सोडून गेली आता ज्यांना पियाला पाणी मिळणार न्हाई ते गाव सोडतील... घर कुलूपबंद करून, लेकरांच पाटी, पेन्सीलवर वरवंटा फिरवूनच. 
 
- अनंत साळी, जालना

No comments:

Post a Comment