Monday 25 March 2019

कांदामुळाभाजीचा छंद

भाजीपाल्याच्या १५, फळभाज्या आणि वेलवर्गीय भाज्या ६०, कडधान्य आणि तृणधान्य प्रत्येकी २०, आणि इतर १०. अशा एकूण १२५ देशी बियाणांचा संग्रह केला आहे अनिल गवळी यांनी. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर इथे त्यांची शेती. 
गवळी यांची घरची १५ एकर शेती. गेली ९ वर्ष ते देशी बियाणांवर काम करत आहेत. पिगेली वळी मोहरी,काळा गहू,काळा हुलगा,पांढरे कारळ, सोलापूरची दगडी ज्वारी,मराठवाड्यातील देशी तूर, लाल, पिवळी ज्वारी, जळगावची दादरा अशा एकाहून एक मौल्यवान बियांचा संग्रह. यात मदत मिळाली मोहोळ इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांची.
देशी बियाणे राहिले तरच अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्नदेखील. बदलत्या वातावरणात देशी बियाणेच तग धरू शकतं,असं गवळी यांना वाटतं. त्यामुळे पैसे किती मिळतात,यापेक्षा देशी बियाणे वाचले पाहिजे, असा त्यांचा ध्यास. याच ध्यासापायी त्यांनी सहा एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे. बियाणे द्या आणि देशी बियाणे घ्या, या तत्त्वावर राज्यभरात विविध ठिकाणी होणार्‍या कृषी प्रदर्शनात,स्वयंसेवी संस्थाच्या वतीने होणार्‍या कार्यक्रमात ते सहभागी होतात. एखाद्याकडे वेगळे बियाणे मिळाले तर ते घेऊन त्या बदल्यात आपल्याकडचे बियाणे त्याला मोफत देतात. या सूत्रातूनच बियाणेसंग्रह वाढण्यास मदत होत आहे. बियाणांचा प्रसार होण्यासाठी दहा ग्रॅमचे पाऊच बनवून त्याची २० रुपयात विक्री केली जाते.

सूक्ष्म निरीक्षणांद्वारे देशी बियाण्याची ओळख करून घेता येते, असं गवळी सांगतात. ''मेथी, पालक किंवा अन्य भाज्यांच्या पानाच्या कडेला बारीक लाल रेषा किंवा खालील बाजूच्या मुळ्या लाल असतात. एक जून ते एक ऑक्टोबरच्या दरम्यान पावसाच्या परिस्थितीनुसार देशी टोमॅटो लागवड करतो.तीन-साडेतीन महिन्यांच्या कालावधीनंतर तो चांगला पिकतो. त्याला चिऱ्या पडतात,देठ सुकतात. तेव्हा तो मध्यभागी चिरायचा. दोन भाग करून रात्रभर पाण्यात भिजवायचा. दुसऱ्या दिवशी पाण्याने स्वच्छ धुवून चांगल्या प्रतीचे बियाणे गोळा करून ते राखेत ठेवायचे. किमान दोन वर्षांपर्यंत ते टिकून राहते. हाच निकष काकडी, वांगीसाठी लागू होतो.'' काटेरी, भरताचे, हिरवे, काटेरी, वांगे, तूप वांगे,हिरवी, पांढरी-काटेरी काकडी,काशी भोपळा,काळा आणि लाल पावटा,पांढरा, लाल मोठा वाल ,गोल, काशी, चेरी टोमॅटो,काळा वाटाणा, लाख,लाल-काळी-पांढरी फररसबी,लाल-काळा-पिवळा झेंडू,झुडपी चवळी, लाल वेलीची चवळी,एरंड, जवस, कारळे, पिवळी, काळी मोहरी, लाल कांदा, राजगिरा, खपली गहू, काळा कुसळीचा गहू अशा काही परंपरागत बियाणांविषयी गवळी सांगतात. ''पूर्वी फक्त मीठ आणि कापड एवढंच बाजारातून विकत आणाव लागायचं. घरी गरज भागवून धान्य, भाजीपाला विक्रीसाठी बाजारात नेलं जायचं. आज संकरित बियाणांचा वाढलेला वापर आणि रासायनिक खतांमुळे जमिनी खराब झाल्या आहेत. परिणामी, प्रत्येक वस्तू आज विकत आणावी लागते. मला हे थांबवायचे आहे. त्यासाठी देशी बियाणे संवर्धनाचा माझा प्रयत्न आहे. ''
(संपर्क : अनिल गवळी - ९७६७७६७४९९)

-संतोष बोबडे

No comments:

Post a Comment