Monday 25 March 2019

यंदा कमी पाण्यातही चांगलं भातपीक आलं


अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील पाटीलवाडी(धामणवण). अकोले तालुक्यातल्या बहुतांश गावांप्रमाणे आदिवासीबहुल. भरपूर पाऊस पडत असल्यामुळे भात हे मुख्य पीक. मात्र अलीकडे भातासह अन्य पिकांच्या गावरान जातींची लागवड कमी झालेली. उत्पन्नाची फारशी साधनं नसल्यानं नगर, पुणे, नाशिक इथं मजुरी.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी गावातल्या १४ आदिवासी महिलांनी तीन वर्षांपूर्वी कावेरी महिला बचतगट सुरू केला. सखुबाई धराडे(अध्यक्ष), शशिकला धिंदळे (सचिव), कमल धिंदळे, उषा धिंदळे, ललिता धिंदळे,गंगुबाई धिंदळे, सीताबाई करवंदे, रुक्‍मिणी धराडे, कांता धराडे, सुगंधा करवंदे, सुरेखा धिंदळे, उषा धराडे, कविता भांगरे, सविता धिंदळे अशा या १४ जणी. महिन्याला १०० रुपये बचत. वार्षिक उलाढाल २५ ते ५० हजार. विविध पिकांच्या देशी बियाणांची बँक गटानं सुरू केली आहे. त्यासाठी प्रोत्साहन मिळालंय लोकपंचायतच्या सारंग पांडे यांचं. लोकपंचायत ही संगमनेर इथली सामाजिक संस्था. परिसरातल्या आदिवासींसाठी अनेक वर्षांपासून काम करणारी.
कावेरी बचतगट त्यांच्या बियाणं बँकेतून परिसरातल्या शेतकऱ्यांना दीडपट परतीच्या अटीवर पेरणीसाठी बियाणं देतो. यंदा गटानं २५० च्या वर शेतकऱ्यांना किफायतशीर दरात बियाणं दिलं आहे.उत्पादनानंतर परत आलेलं बियाणं योग्य असल्याची खात्री करून आवश्‍यकतेनुसार साठवण करतात. बियाणात काही त्रुटी आढळली तर त्याचा तांदूळ करून विक्री केली जाते.
गटाकडे सध्या भातामधील काळभात, टायचन भात,इंद्रायणी, आंबेमोहर, ढवूळ, तामकुडाई, वरगळ, खडक्‍या, रायभोग, कोळपी,नाचणीमधील मुटकी, फरंगाडी, शितोळी; गव्हातील कल्याण सोना, बक्षी, बोटका; भुईमूगातील कुंड्या, घुंगऱ्या, लाल्या, एरंड्या; वाटाण्यातील काळा,हिरवा, ढवळा; उडीदामधील उडदया, उडीद. ज्वारीमधील उतावळी ज्वारी,
पांढरी व लाल चवळी; वालातील कडूवाल, गोडवाल, काळावाल; घेवडयामधील श्रावणी, पेरवेल, पतडा, आबई, काळाघेवडा, वाडवल, गुडघ्या यांचे वाण आहेत. शिवाय औषधी वनस्पतीमध्ये कोंबडकंद, अमरकंद, अर्जुन सादडा, रगतरेहडा, सतापा, बाळ हिरडा, बेहडा, गावरान तुळस. याचबरोबर हावरी (तीळ),पपई, मोहरी, सूर्यफूल, मिरची, कारले, चंदनबटवा, दोडका, डांगर,काकडी,बळुक, भेंडी, गोरानी गवार, कोंबडीभाजी, तेराभाजी, कुरडूभाजी, बडदा,धापा, फांदीची भाजी, भोकरभाजी, काटेरी वांगी, घोसाळे, खुरासणी, वरई,राळा, भादुली, हरभरा, मसूर, हुलगे यांचेही बियाणं आहे.
राजूर इथं आदिवासी विभागामार्फत आयोजित डांगी पशुप्रदर्शनात उत्कृष्ट महिला गट म्हणून गटाला गौरवलं आहे. पुणे, हरियाणा, नगर, जळगाव, बंगलोर,मुंबई, बिहार आदी भागांतील शेतकरी, महिलांनी बियाणं बँकेला भेट दिली आहे. यावर्षी या भागात पहिल्यांदाच पावसाचं प्रमाण कमी आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी गावरान वाणाचा भात पेरला तो कमी पाण्यात चांगला आला, असं महिला सांगतात.

- सूर्यकांत नेटके, अहमदनगर

No comments:

Post a Comment