Sunday 18 August 2019

अन् त्याला मिळालं जीवदान


  रत्नागिरी जिल्हा न्यायालयाचं आवार. इथं एक वटवृक्ष उभा होता. न्यायालयाचा गेल्या 150 वर्षांपासूनचा साक्षीदार. नुकताच म्हणजे शनिवारी सकाळी हा वृक्ष कोसळला. या वृक्षाचं पुनर्रोपण करता येईल का असा विचार सुरू झाला. जिल्हा न्यायाधीश जोशी साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेतला. बार असोसिएशनच्या सदस्यांनी ही कल्पना उचलून धरली.
त्यानंतर या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागा निवडण्यात आली. मोठा खड्डा खणण्यात आला. या कामी सार्वजनिक बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण, फिनोलेक्स कंपनी आदींनी सहकार्य केलं. मूळ वृक्षाच्या काही फांद्या तोडून क्रेनच्या साह्याने उचलून त्याच्या पुनर्रोपणाला सुरुवात झाली. शनिवारी रात्री सुरू झालेले हे काम तीस तासांच्या मेहनतीने अनेक कर्मचाऱ्यांच्या मदतीने व यंत्रणेच्या सहकार्याने पूर्ण झाले. विशेष म्हणजे न्यायाधीश साहेब व अधिकारी वर्ग पहाटेपर्यंत उपस्थित होते.
१५०वर्षांचा साक्षीदार असलेला हा वृक्ष पुन्हा उभा राहिल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होते. न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच असा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला गेला आहे. वृक्ष सहजगत्या तोडता येतात. परंतु, वृक्ष टिकवण्याचा क्षण किती आनंददायी असतो हे या उपक्रमामुळे सिद्ध झालं.

- जान्हवी पाटील, रत्नागिरी 

No comments:

Post a Comment