Sunday 18 August 2019

अडीच लाखांवर मुलं मराठीत नापास (बातम्या तुमच्या-आमच्या मुलांच्या )

अडीच लाखांवर मुलं मराठीत नापास बाळ जन्माला येतं. मग एकेक करून बाळाची प्रगती सुरू होते. पालथं पडणं, पुढे सरकणं, रांगणं, चालणं, बोलणं. बाळाचे सुरुवातीचे बोल आपल्या कानावर पडावेत म्हणून सगेसोयरे जिवाचा कान करतात. बाळाच्या मुखातून येणारा पहिला शब्द. त्याचं कोण कौतुक! भाषा येणं, समजणं किंवा बोलणं किती महत्त्वाचं, हे या घटनेतून लक्षात येतं.
बाळाला त्याची स्वतःची भाषा मिळण्याचा प्रवास सुरू होतो. वयाच्या दोन ते तीन वयापर्यंत बाळ आईची भाषा बऱ्यापैकी आत्मसात करतं. आता बाळाची परीक्षा सुरु होते. याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. बाळाने योग्य उत्तर दिलं की शाब्बासकी. काही चुकलं तर प्रेमाने समजावून सांगणं. बाळ अणि घरातील सर्वजण, हा खेळ आनंदाने, प्रेमाने खेळू लागतात. बाळही आनंदाने नव्या शब्दांचा स्वीकार करत समृदध होत असतं. भाषा अवगत करण्याचा हा प्रवास किती छान!
पुढे बाळाचा शालेय प्रवास सुरू होतो. शाळेत इंग्रजी भाषेची ओळख होऊ लागते. शिकताना अडखळायला होतं. या आधी भाषा शिकण्याकरिता बाळाला असे जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागलेले नसतात. आता हळूहळू ही इंग्रजी येत नाही म्हणून घरातले लोक ओरडू लागतात. बाळ गोंधळतं. आपल्याला ही नवी भाषा येत नाही म्हणून आई-बाबा इतकं का रागवतात? यापूर्वी ते किती छान भाषा शिकवत, शब्दओळख करून देत असत. या गोंधळात बाळ आपल्या स्वतःच्या भाषेपासून दूर जाऊ लागतं. आईवडिलांच्या पसंतीस उतरण्यासाठी नव्या भाषेचा अभ्यास करू लागतं. बाळाचा इयत्ता ते इयत्ता प्रवास सुरू होतो.
मातृभाषा म्हणजे जन्मतःच ज्या भाषेचा स्वीकार बाळ सहज करतं, ज्या भाषेतून बाळ विचार करू लागतं, ती भाषा. अचानक परिस्थिती बदलते. त्याला नव्या भाषेला तोंड द्यावं लागत. एखादा विद्यार्थी नव्या भाषेचा स्वीकार सहज करत नाही. हळूहळू तो आपली मातृभाषादेखील विसरू लागतो. तो कोणत्या भाषेतून विचार करतोय याची शंका येण्याइतपत तो स्वभाषा विसरून जातो. म्हणून काय आपल्या मुलांनी मातृभाषेतच नापास व्हायचं?
यावर्षी राज्यात ११ लाख ९३ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी दहावीची मराठीची परीक्षा दिली. त्यापैकी २ लाख ५७ हजार ६२७ विद्यार्थी नापास झाले. एवढ्या मोठ्या संख्येने मुलं चक्क मराठीत नापास. वझे केळकर महाविद्यालयाचे मराठी भाषा विभागप्रमुख, ‘मराठी प्रथम’ या ऑनलाईन नियतकालिकाचे संपादक आणि भाषा सल्लागार समितीचे सद्स्य डॉ प्रकाश परब यांना आम्ही त्यांचं मत विचारलं. ते म्हणाले की, मातृभाषेचं ज्ञान कमी कमी होत जाणं, हे भाषिक र्‍हासाचं एक प्राथमिक लक्षण आहे. परिपूर्ण माणूस बनण्यासाठी भाषा मदत करते. म्हणून या घटनेकडे गांभीर्याने पाहून आवश्यक ती उपाययोजना केली पाहिजे. बदललेला अभ्यासक्रम व मूल्यांकन पद्धती लक्षात घेऊन शिक्षकांचं प्रशिक्षण करणं. नापास विद्यार्थी नेमक्या कोणत्या बाबतीत मागे पडले हे शोधून काढून त्यांना तसं मार्गदर्शन करणं. भाषावापराचे भरपूर स्वाध्याय सोडवून घेणं. शिक्षकांनी असे स्वाध्याय तयार करणं. पाठांतराऐवजी भाषेचा उपयोग करण्यावर भर देणं, असे उपाय परब सरांनी सुचवले आहेत.

- लता परब

No comments:

Post a Comment