Sunday 18 August 2019

मूल कुपोषित असल्याचं लक्षात आलं की अंगणवाडी ताई इथे पाठवते


''मूल कुपोषित असल्याचं लक्षात आलं की अंगणवाडी ताई त्याला इथे पाठवते.'' बीड जिल्हा रुग्णालयातले हनुमंत पारखे सांगत होते. ऊसतोडणीसाठी स्थलांतर करताना अनेकदा मुलंही सोबत. या मुलांच्या खाण्यापिण्याची आबाळ ठरलेली. त्यामुळे जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं. शासनानं २०१५ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात एनआरसी अर्थात पोषण पुनर्वसन केंद्र सुरू केलं. . बीड जिल्ह्यातल्या या केंद्रानं गेल्या ४ वर्षात ५५० हून अधिक मुलं कुपोषणमुक्त केली आहेत.
''कक्षात मूल भरती झालं की प्रथम त्याच्या सर्व वैद्यकीय चाचण्या होतात. वजन न वाढण्याची काय कारणं आहेत ती शोधली जातात. कुठला आजार असेल तर त्यानुसार उपचार केले जातात. '' डॉ पारखे सांगतात.
कुठलाही आजार नसेल तरीही बालकाचं वजन, वय आणि उंचीच्या प्रमाणात नसेल तर आहारतज्ञांच्या देखरेखीखाली त्याला पोषणआहार दिला जातो. आहारतज्ज्ञ सावित्री कचरे सांगतात, '' १४ दिवस बालकाला कक्षात ठेवतो. पहिले सात दिवस मिल्क ७५ आणि नंतरचे सात दिवस मिल्क १०० फॉर्म्यूला देतो. दूध, मुरमुरे, खाद्यतेल, साखर यापासून हा फॉर्म्यूला तयार केला जातो. याशिवाय, शिरा, उपमा, फळे, अंडी दिली जातात. वजनाची रोज तपासणी करतो.''
वर्ष २०१५ मध्ये ७५, २०१६ मध्ये १७५, सन २०१७ मध्ये २०९ तर सन २०१८ मध्ये १२० बालकांवर उपचार झाले. कक्षाची सध्याची क्षमता २० खाटांची आहे.
विशेष म्हणजे मुलांसोबत थांबणाऱ्या पालकांच्याही भोजनाची व्यवस्था असते. १४ दिवसांची बुडीत मजुरी म्हणून दिवसाला १०० रुपये त्यांना दिले जातात. रुग्णालयातून घरी गेल्यावर कशी काळजी घ्यावी ते आईला समजावतात . पोषणयुक्त आहाराबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देतात. अंगणवाडी ताई, डॉक्टर, परिचारिका , आहारतज्ज्ञ सर्वांच्या समन्वयातून हे कार्य होत आहे.


-अमोल मुळे , बीड 

No comments:

Post a Comment