वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातलं बोरगाव हातला. संपूर्ण तालुक्यातच वैरणाची टंचाई होती. त्यावर मार्ग काढत संदीप आंबुडारे, गुड्डू वाळके, सचिन आंबूडरे, भारत मानकर या युवकांनी १२० म्हशींच्या सकस आहाराची सोय केली.
परिसरात निम्न वर्धा धरण आहे. अडीच हजार हेक्टरवर पसरलेलं. पुरेसा पाणीसाठा उपलब्ध. मात्र काही ठिकाणी चढउतार असल्यानं उन्हाळ्यात पाणी आटलं. तिथं हिरवीगार चाऱ्याची बेटं निर्माण झाली. पंचवीस पंचवीस एकराची दोन बेटं असून आजूबाजूला पूर्ण पाणी. नांदुरा काळे गावापासून सात किलोमीटर अंतरावर हे बेट आहे. चाऱ्याच्या शोधात असताना संदीप , गुड्डू, सचिन आणि भारतला हे बेट गवसलं. चौघांकडे वडिलोपार्जित शेती आणि म्हशीसुद्धा. पण म्हशींच्या चाऱ्याचा प्रश्न होता.
बेटावर म्हशी नेण्याचं त्यांनी ठरवलं. नियोजन केलं . नावेला काही म्हशी बांधल्या. उरलेल्या म्हशी पाण्यात सोडल्या. त्यांच्या मागे पोहत पोहत त्या बेटावर नेल्या.
म्हशींना मुबलक प्रमाणात हिरवा चारा. पाण्याचाही प्रश्न मिटला. म्हशी तिथून परत येऊ शकत नसल्यामुळे त्यांची राखण करण्याची काळजी मिटली. आता दररोज बेटावर जाऊन दूध काढणं, ते आणायचं आणि विकायचं कसं हा प्रश्न होता.
त्यासाठी चौघांनी एक नाव विकत घेतली. ती चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. मग चौघे पहाटे साडेपाच वाजता दुचाकीवरून किनाऱ्यावर येऊ लागले. गाड्या तिथेच ठेवायच्या. नाव वल्हवत बेटावर जायचं. बेटावर पोहोचायला एक तास. वारा असेल तर नाव वल्हवणे त्रासदायक. तिथं पोहोचल्यावर म्हशींचं जवळपास १०० लिटर दूध काढायचं, ते नावेनं आणायचं. मग नाव किनाऱ्यावर उभी करून दुचाकीनं परिसरात दूधविक्री. संध्याकाळी पुन्हा बेटावर दूध काढायला जायचं. सकस हिरव्या चाऱ्यामुळे दूध चांगल्या प्रतीचं असतं.
आपल्या कल्पकतेनं आणि मेहनतीनं संदीप , गुड्डू, सचिन आणि भारतनं बेरोजगार युवकांसमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे.
- सचिन मात्रे , वर्धा
No comments:
Post a Comment