Sunday 18 August 2019

आणि समुद्रकिनारा स्वच्छ झाला

मेरीटाईम बोर्डाकडून स्वच्छ सागरतट अभियान राबविण्याच्या सूचना रत्नागिरी मेरीटाईम बोर्डाला आल्या. इथले प्रादेशिक अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले. सूचना मिळताच त्यांनी जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतीच्या बैठका घेतल्या. प्रत्येक ग्रामपंचायतीने सागर स्वच्छतामोहिमेत स्वत:हून सहभाग घेतला. स्वतः कॅप्टनसाहेब समुद्र स्वच्छ करताना पाहून आणखी काही लोक अभियानात सहभागी झाले आणि हां हां म्हणता वर्षभरात रत्नागिरीतील जवळपास 23-25 समुद्रकिनाऱ्यांचा कायापालट झाला. यातूनच समुद्रकिनारी रोजगारनिर्मितीही झाली. हे सगळं नियोजन यशस्वी केलं, ते संजय उगलमुगले यांनी. उगलमुगले सर 14 ते 15 तास प्रत्यक्ष कामावर हजर राहिले आणि त्यांच्या टीमने त्यांना उत्तम सहकार्य केलं.
प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आपले कर्तव्य ठरल्याप्रमाणे बजावतच असतात. त्या कर्तव्यापलीकडे जाऊन शासनासाठी काम करणारे अधिकारी समाजात फार कमी पाहावयास मिळतात. कँप्टन संजय उगलमुगले यांनी 2 वर्षांपूर्वी रत्नागिरी प्रादेशिक बंदर अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. अतिशय संयमी, शांत मात्र कामात तितकेच हुशार, तल्लख असणारे उगलमुगले अल्पावधीतच रत्नागिरीत विशेषत: सर्व ग्रामपंचायतीत सुपरिचित आहेत.


कोकणाला 720 किमी सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला आहे. याठिकाणी नियमित स्वच्छता व काही सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने मेरीटाईम बोर्डाकडून हा उपकम सुरू करण्यात आला. या अभियानासाठी मेरीटाईम बोर्डाकडून 3 कोटी 9 लाख इतका निधी उपलब्ध झाला होता. निर्मल सागरतट अभियानात सहभाग घेतल्यानंतर कोणत्या ग्रामपंचायतीने काय करायचे कशाप्रकारे सुविधा उपलब्ध करता येईल. या निधीचा 100 टक्के विनियोग करून सागरी किनाऱ्यांचा कायापालट करायचा. त्यासाठी केवळ ग्रामपंचायत नाही तर लोकसहभाग महत्त्वाचा होता. त्यामुळे उगलमुगले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सागर स्वच्छता अभियानात स्वत: सहभाग घेतला. अधिकारी सहभागी झाल्याचे पाहून ग्रामस्थही मोठ्या संख्येने समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले.
लहान वयात मुलांना स्वच्छतेचं महत्त्व कळावं यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांना समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी त्यांनी सहभागी करून घेतलं. त्याचबरोबर काही उपकमात जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर विभागांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.
आज रत्नागिरीच्या समुद्र किनाऱयांवर या अभियानातून पर्यटकांना बसायला बेंचेस, चेजिंग रूम, गार्डन, ओपन जीम, पार्कींग व्यवस्था, पथदीप, स्वच्छतागृह झाली आहेत. या सगळ्या सुविधांची देखभाल आणि देखरेख करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
कँप्टन संजय उगलमुगले-प्रादेशिक बंदर अधिकारी रत्नागिरी म्हणाले, की निर्मल सागरतट अभियान एका वर्षासाठी राबविण्यात आलं होतं. मात्र या अभियानातून रोजगारनिर्मिती करून कायमस्वरूपी स्वच्छता कशी राखली जाईल, पर्यटकांना चांगल्या सुविधा यातून कशा मिळतील या दृष्टीने ग्रामपंचायतीने प्रयत्न केले आहेत. भविष्यातही स्वच्छता, देखभाल, देखरेख ठेवण्यात येईल. या कामात सर्वच ग्रामपंचायती तसंच मेरीटाईम विभागाचे आमचे सर्व कर्मचारी अधिकारी यांची मेहनत आहे.


- जान्हवी पाटील,रत्नागिरी 
 #नवीउमेद
Janhavi Patil

No comments:

Post a Comment