Sunday 18 August 2019

रोप देणारी राखी

रत्नागिरीतल्या अविष्कार संस्थेची शामराव भिडे कार्यशाळा. विशेष मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणारी. सण पर्यावरणपूरक व्हावेत यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते.
यंदा रक्षाबंधनासाठी शाळेत वेगळ्या प्रकारे तयारी सुरू आहे. विद्यार्थी बिया वापरून राख्या तयार करत आहेत. ही राखी विसर्जित केली की त्यातून रोप उगवतं. राखी सोडल्यानंतर ती थोडा वेळ पाण्यात भिजत घालायची. नंतर कुंडीत किंवा मातीत कुस्करुन टाकायची. त्यापासून अल्पावधीतच रोपं तयार . संकल्पना आहे वृक्षवल्ली नर्सरीच्या व्यवस्थापक माधुरी साळवी कळंबटे यांची. त्यासाठी प्रशिक्षण सुरू आहे.
कार्यशाळेतल्या सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांना यात सामावून घेतलं आहे. तीव्र मतिमंदत्व गटातल्या विद्यार्थ्यांना वर्तमानपत्राचे लहान तुकडे करायला देतात. मध्यम मतिमंदत्व गटातली मुलं कागदी तुकड्यांचा लगदा करणं, शाडूच्या मातीसमवेत त्याचं मिश्रण करणं ही कामं करतात. कागदी लगदा ४० टक्के तर शाडूची माती ६० टक्के. विद्यार्थी हे मिश्रण मळतात. मग त्याचे छोटे गोळे, त्याला आकार देणं,त्यात झेंडू, टोमॅटो आदीच्या बिया घालणं, राखी रंगवणं, दोरे बांधणं, गाठी मारणं, विक्री करणं सौम्य मतिमंदत्व गटातले विद्यार्थी करतात. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं आहे. विद्यार्थी उत्साहानं ही कामं करत आहेत.
५ ते १० ग्रॅम वजनाच्या सुमारे २५० राख्या कार्यशाळेत तयार होत आहेत. ''हे बंधन निसर्गसंरक्षणाचे आहे, तसेच विशेष मुलांच्या कलाकुसरीला वाव देणारं आहे.'' असं माधुरी साळवी कळंबटे आणि कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर सांगतात.

- जान्हवी पाटील, रत्नागिरी 

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2490647157648620 

No comments:

Post a Comment