Sunday 18 August 2019

दिव्याचा पाड्यावर पुढल्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही


नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातली माळेगाव पंचायत. इथलं दिव्याचा पाडा. लोकसंख्या ८५०. छोटंसं, टुमदार, आदिवासी वस्तीचं गाव. अत्याधुनिक सेवासुविधांपासून लांब. पावसाळ्यात सरींमध्ये बुडालेलं निसर्गरम्य गाव उन्हाळ्यात मात्र थेंबथेंब पाण्याच्या प्रतीक्षेत. त्यामुळे स्थलांतर ठरलेलं. ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतला, नाशिकमधल्या निर्मल गंगा गोदा बहुउद्देशीय संस्थेनं.
संस्थेनं सरपंच तानाजी दिवे आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. गावात ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ उपक्रम कसा महत्वपूर्ण ठरेल हे त्यांना समजावून सांगितलं. शासनाच्या कोणत्या योजना आपल्याला उपयोगी पडतील ते सांगितलं. मातीचं परीक्षण झालं. जमिनीची धूप झाली होती. मातीची पत कमालीची घसरली होती. यामुळे पीक अत्यल्प प्रमाणात येत होतं.
ही परिस्थिती बदलण्यासाठी गावात ‘समतल चर आखणे’ हा प्रकल्प हाती घेतला. जून महिन्यात जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत श्रमदान शिबीर राबवलं. सरपंच दिवे यांनी अडीच एकर माळरान खुलं करून दिलं. संस्थेला, शासकीय यंत्रणेला मदत केली. गावकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. जिल्हाधिकारी सुरज मांढरे, निर्मल गंगाच्या शीतल गायकवाड, दिपाली खेडकर आणि रोहिणी दराडे यांची साथ मिळाली. गावातील पाझर तलावाचाही गाळ काढण्यात आला. नियोजित वेळेत काम पूर्ण झालं.
नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरीमध्ये नुकताच दमदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी वाहून गेलं. दिव्याच्या पाड्यावर मात्र समतल चर, बंधाºयामुळे पाणी अडवलं गेलं . गाळ काढल्यामुळे बंधाऱ्यात समाधानकारक पाणी साचलं. यामुळे पुढल्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही, असं गावकरी म्हणताहेत.
संस्था आता गावातलं स्थलांतर रोखण्यासाठी काम करणार आहे. निर्मल गंगाच्या अध्यक्ष शीतल गायकवाड सांगतात, ''गावातली नैसर्गिक संसाधनं वापरून रोजगार निर्मितीचं संस्थेचं लक्ष्य आहे. त्यासाठी मुक्त विद्यापीठाची मदत घेण्यात येणार आहे. युवकांना शेळीपालन, कुक्टपालनचं प्रशिक्षण देण्यात येईल. माती परीक्षणानंतर कृषी विभागाच्या मदतीने फळबाग योजना, रोपवाटिका कशी सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.''


-प्राची उन्मेष , नाशिक 

No comments:

Post a Comment