Sunday 18 August 2019

मूल अमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये यासाठी (बातम्या तुमच्या-आमच्या मुलांच्या)


एका शाळेत पालक सभा सुरू होती. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या मुलाला शाळेतून काढण्याबाबतचा विषय अजेंडावर होता.जमलेले सर्वच पालक चिंतातुर दिसत होते.काही मुलाबद्दल सहानभूती दर्शवत होते,तर काही मुलाला शाळेत न ठेवण्याच्या समर्थनात होते. प्रत्येकाचं मन अस्वस्थ करणारा विषय. आणि असणारच कारण त्यांच्या मुलांचा प्रश्न होता. पालक आपापसात त्या मुलाच्या पालकांना दोष देत होते. खरंतर कोणाला दोष देण्यापेक्षा अमली पदार्थांच्या व्यसनाची समस्या दूर कशी होईल, याचा विचार व्हावा. प्रत्येक पालकांनी फक्त आपलंच मूल नाहीतर समाजातील कोणतंच मूल याच्या आहारी जाऊ नये याबाबत सतर्क राहून त्याबद्दलची माहिती घ्यावी.
'ड्रग्ज फ्री कॅम्पस' या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थविरोधी पथकाच्यावतीने शाळा आणि कॉलेजमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाते. या मोहिमेदरम्यान विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यात असं लक्षात आलं की अनेक शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सहज मिळतात.अनेकदा पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाण गांजाचे असते . शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये गांजाची प्रचंड क्रेझ आहे. गांजा वनस्पतीजन्य असल्याने त्यात शरीराला हानिकारक असे काहीच नाही, असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. यासाठी इतिहासातील महापुरुषांचे दाखले दिले जातात. इतर अमली पदार्थांपेक्षा गांजा स्वस्त मिळतो. आधी सिगारेट आणि नंतर गांजाच्या आहारी गेलेली मुले अधिक तीव्रतेच्या नशेसाठी पुढे एमडी,चरस,कोकेन घेण्यास सुरुवात करतात.
एक जागरूक पालक म्हणून प्रत्येकानं जबाबदारी ओळखून आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पालक, नोकरी व्यवसायामुळे व्यस्त असतात. त्यामुळे मुलांकडे रोजच्यारोज लक्ष ठेवणं त्यांना शक्य होत नाही.तरीही आपण वेळोवेळी शाळेबद्दल,अभ्यासाबद्दल त्यांच्या मित्रांबद्दल चौकशी करणं गरजेचं आहे. मुलांबरोबर वेळोवेळी संवाद ठेवून, त्यांच्या अडचणी सोडवून आपण त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला पाहिजे.


- लता परब   #नवीउमेद

No comments:

Post a Comment