Sunday 18 August 2019

युवकांनी थांबवली मुक्या जीवांची पाण्यासाठीची भटकंती...


बीड जिल्ह्यातला शिरूर तालुका. शिरूरपासून १० किलोमीटर अंतरावर पाडळी गाव. उथळा नदीजवळ वसलेलं. परिसरात हरीण, मोर, कोल्हा आणि इतर वन्यजीवांचा मोठा वावर. परंतु, मराठवाड्यातल्या इतर भागांप्रमाणे या भागातही पाणीटंचाई. वन्यप्राण्यांसाठी ती जीवघेणी ठरत होती. चार -पाच महिन्यांच्या अंतरात तीन मोर आणि काही हरणं मृतावस्थेत आढळली. वाहनाखाली येणं, विहिरीत पडणं, कुत्र्यांची शिकार होणं ही जरी त्याची कारणं असली तरी पाण्याच्या शोधातून हे सारे घडले. इथले युवा सामाजिक कार्यकर्ते माऊली सिरसाट यांना ही बाब लक्षात आली.
माऊली आणि त्यांच्या मित्रांनी संपूर्ण पाडळी शिवारात वन्यजीवांसाठी पाणवठे उभारण्याचं ठरवलं. मार्च महिन्यापासून हा उपक्रम सुरू झाला. दीडशे लिटरचे १० आणि ७५ लिटरचे १५ पाणवठे वन्यजीवांच्या अधिवासात ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवसापासूनच प्राणी हे पाणी पिऊ लागले.
ज्या शेतकऱ्यांच्या शेताजवळ हे पाणवठे आहेत, त्यांनी नियमित पाणी भरण्याची जबाबदारी घेतलीये. असे जवळपास ५० शेतकरी आहेत. गावातील युवक, ज्येष्ठही या उपक्रमात योगदान देत आहेत. कोणी टाकी भेट देतो तर कोणी टाकीत नियमित पाणी भरतं. पाणवठ्यांमध्ये सकाळ - संध्याकाळ अडीच हजार लिटर पाणी नियमित भरलं जातं. दिवसेंदिवस या उपक्रमातील लोकसहभाग वाढत असून वन्यप्राण्यांना जीवनदायी ठरतोय.
पावसाला सुरुवात झाली असली तरी अजूनही या परिसरात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. चांगला पाऊस होऊन जलाशयात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत हे पाणवठे नियमित भरण्याचा युवकांचा निर्धार आहे.
आपल्या गाव परिसराचे आणि निसर्गाचे वैभव असलेले वन्यजीव जगावेत, हीच या उपक्रमामागील निःस्वार्थ भावना आहे.

- अनंत वैद्य, बीड.

No comments:

Post a Comment